भुजबळ सरकारमध्ये परतले   

राजभवनात घेतली मंत्रिपदाची शपथ 

मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवून सरकार स्थापन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांना वगळून मोठा धक्का दिला होता. पण, अखेर भुजबळ यांची नाराजी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा व त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊन सरकारमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी राजभवनात छोटेखानी शपथविधी सोहळ्यात भुजबळ यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा हेच खाते दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर ‘जहा नही चैना, वहा नाही रेहना’ म्हणत उघड नाराजी व्यक्त करणार्‍या भुजबळ यांनी काल, ‘ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड’ असे सांगत आता कुठलीही कटूता नसल्याचे सांगितले.
 
मंत्रिमंडळातून वगळल्याने नाराज झालेले भुजबळ हे शरद पवार गटात जाणार अशी कुजबूज मागच्या काही दिवसांपासून सुरू होती. मध्यंतरी, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली खंतही बोलून दाखवली होती. तेव्हा, फडणवीस यांनी थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला होता. 

धनंजय मुंडे यांच्या परतीची वाट बिकट 

१९९१ पासून मंत्री म्हणून शपथ घेण्याची भुजबळ यांची कालची  नववी वेळ आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग अवघड  बनला आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे  राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदाची एक जागा रिकामी होती. मंत्रिमंडळातील आणखी एक जागा रिकामी असली तरी ती राष्ट्रवादीच्या कोट्यातील नसल्याने मुंडे यांचे परतणे तूर्त तरी अवघड आहे.
 
ही सबुरी अखेर भुजबळ यांच्या कामी आली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर भुजबळ यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत घोषणा केली व काल सकाळी राजभवनात एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह वरिष्ठ मंत्री वनेते उपस्थित होते. 

आठवडाभापूर्वीच झाला होता निर्णय

भुजबळ यांनी शपथविधीआधी माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. मंत्रिपदाबाबतचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला होता. मंगळवारी मंत्रिमंडळातील नेते व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहू शकतात, त्यामुळेच हा दिवस निवडण्यात आला.  

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा

भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने नाशिक जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या आता चार झाली आहे. महायुतीत सध्या नाशिक आणि रायगड जिल्हाच्या  पालक मंत्रिपदावरून वाद आहे. सुरुवातीला नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपच्या  गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. यावरून शिवसेना  शिंदे आणि अजित पवार गटात नाराजी होती २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या  पालकमंत्रिपदाचे महत्त्व वाढले आहे. 

भुजबळ म्हणजे ओबीसींचा आवाज : फडणवीस

छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. देशातील ओबीसींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.  राष्ट्रवादीने भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. भुजबळांसारखे ज्येष्ठ मंत्री, ओबीसी हितचिंतक मंत्रिमंडळात आल्याने त्याचा सरकारला फायदा होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
 

Related Articles